"असं शिक्षण शिक्षण
जसं वाघीणीचं दूध
इथं नाही उच्च नीच
किती भाग्याचं लक्षण "
ह्या ओळीच्या आधारावर आज समाजात शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे.शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे,असे प्रत्येकाला वाटत असते.शिक्षणामुळे माणसाची प्रगती वाढत चाललेली दिसून येते.भारतीय समाज व्यवस्थेत शिक्षणामुळे परिवर्तन झालेले आढळून येत आहे,परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.शिक्षणामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.शिक्षण हे माणसाला अंधारातून प्रकाशात घेऊन जाते.कोणत्याही व्यक्तीला जर शिक्षण नसेल तर डोळे असून आंधळा.आजच्या विज्ञानाच्या युगात शिक्षण नसेल तर व्यक्तीला महत्त्व नाही,अशी काही पालकांची भूमिका दिसून येते.शिक्षण हे आजच्या काळातील गरज बनली आहे.शिक्षण नसेल तर समाजात मान प्रतिष्ठा मिळत नाही.सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक प्रगती ही शिक्षणाशिवाय नाही असे प्रत्येक पालकांना वाटत असते.
आज झपाटयाने दिवसेंदिवस शिक्षण वाढत आहे.पण व्यक्ती हा जागीच आहे.आज प्रत्येक पालकांचे एक स्वप्न आहे,की माझा मुलगा-मुलगी काहीतरी बनावा.ही प्रत्येक आईवडीलांची मानसिकता असते.ज्यावेळी मूल आईच्या गर्भात असते त्यावेळेस आई त्या बालकाविषयी स्वप्न पाहत असते.माझा मुलगा-मुलगी डॉक्टर,इंजिनियर,वकील,एम.पी.एस.सी.द्वारे अधिकारी व्हावा.युपीएससी करून कलेक्टर व्हावा.शिक्षक,तलाठी,पोलीस,किंवा औद्योगिक प्रशिक्षण घेऊन कोणती तरी नोकरी असावी असे प्रत्येक आईवडीलांना वाटत असते.पण हळूहळू मुले ही लहानाची मोठी होतात.त्यांना पंख फुटतात.ते उंच आकाशात उडण्याचा प्रयत्न करतात.तर काहीजण तिथेच थांबतात.
सामाजिकरणाच्या प्रक्रियेत मूल जेव्हा लहानचे मोठे होते तेव्हा प्रत्येक आईवडील मुलांच्या भविष्याचा प्रश्न उद्भवतो.लहानपणापासून शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न केला जातो.प्रत्येक आईवडीलांचा अट्टहास असतो की माझा मुलगा-मुलगी समाजात काहीतरी बनावी ही अपेक्षा असते.म्हणूनच मुलांना मोठं मोठ्या शाळेत प्रवेश देण्याचा प्रयत्न करतात.तेथे प्रवेश मिळविण्यासाठी लाखो रूपये खर्च करतात.कोणी इंग्रजी माध्यमातून शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लाखो रूपये खर्च करतात.कोणी इंग्रजी माध्यमातून तर कोणी मराठी माध्यमातून शाळेत प्रवेश घेतात.ज्या वयात मुलांना खेळायचे बागडायचे असते त्याच वयात त्यांच्या पाठीवर पुस्तकाचे ओझे लादले जाते.ह्या ओझ्यामुळे मुलांची कुचंबना होतं असते.काही मुल मुली हुशार बनतात.तर काहींना काहीच येत नाही.तरीही पालक हा त्याच्या बुद्धिमत्तेचा विचार न करता त्यांच्या प्रतिष्ठेसाठी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत असतात.त्यांची इच्छा नसतानाही त्यांना शाळेत घातले जाते.हळूहळू त्या मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते व ते मुल-मुली 'ना घर का न घाट का'होते.एकीकडे पालकांची अपेक्षा असते ते दुसऱ्या मुलांच्या सोबत तुलना करत असतात.बघ त्या मुलांना एवढे गुण मिळाले,तेवढे गुण मिळाले.त्या मुलांना उठता बसता टोमणे मारत असताना दिसून येते.
सध्या शाळेची प्रवेश प्रक्रिया होऊन गेली आहे.कॉलेज,महाविद्यालय,मेडिकल कॉलेज,इंजिनियरिंग कॉलेज,नर्सिंग कॉलेज,वेगवेगळे कीर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.ह्या प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक पालकांना वाटते की माझा पाल्य एका नामांकित कॉलेजात किंवा संस्थेत शिक्षण घ्यावा.त्यासाठी पालक काहीही करायला तयार असतात.खाजगी संस्थेत तर डोनेशन मोठ्या प्रमाणावर भरतात.व प्रवेश घेतात.मुलांची इच्छा असो वा नसो,गरीब मजूर पालक तर पैसे नसतानाही सावकाराकडून किंवा उसने पैसे घेऊन कर्ज काढून मुलांनी फिस भरत असतात.व कर्जबाजारी होतं असतात.शिक्षणाच्या नावाखाली आज मोठ्या शहरात मोठ-मोठी खासगी क्लासेस सुरू आहेत.त्यांची फिस पण अमाप आहे.तरीसुद्धा पालक हे त्या क्लासला मुलाला पाठवून देतात.पण मुले ही क्लासच्या नावाखाली आईवडीलांना अंधारात ठेवत असताना दिसून येत आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याच मातीतील पुत्र म्हणजे श्रावण बाळ,पुंडलिक होऊन गेले.पण आजची श्रावण बाळ काय करत आहेत तर मोबाईलच्या विळख्यात सापडली आहेत.एका बाजूला इंटरनेटमुळे देश डिजीटल इंडिया होतं आहे.जगात महासत्ताक बनण्याच्या दिशेकडे वाटचाल करत आहे.दुसरीकडे आजचा युवक बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे.त्याचबरोबर मोबाईलच्या विळख्यात सापडत आहे.त्यांना बाहेर कसे काढायचे हा सुद्धा समाजापुढे आणि प्रत्येक आईवडीलांपुढे याचा प्रश्न पडला आहे.
लहानपणापासून मूल आईवडीलांना फोनवर पाहत असतील आणि आईवडील टिव्ही समोर बसून मुलांना अभ्यास कर म्हणत असतील तर त्यांचे लक्ष मोबाईल टिव्हीकडे नाही का जाणार ? याचाही पालकांनी थोडा विचार करायला हवा.मुलांना सुधारा हे म्हणण्या अगोदर आईवडीलांनी स्वतःला सुधारावे,असे मला वाटते.आई तर एखादी मालिका लागली,मोबाईलवरील व्हिडिओ,जोक,टिकटॉक,फेसबुक,इत्यादींच्या माध्यमातून वापर करत असतात.तेव्हा मुलांचे लक्ष अभ्यासात न लागता त्यांच्या आईकडेच जास्त असते.आई हीच मुलांची पहिली आद्य शिक्षिका असते.कुटुंबातच संस्काराचे धडे मिळत असतात.
आज सर्वात मोठी समस्या पालकांना कोड लावताना दिसून येत आहे ती म्हणजे बरेच तरूण तरूणी नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात.तेव्हा त्यांना विवाह हा नकोसा वाटतो.त्यांच्या विवाहाच्या वयात दिवसेंदिवस वाढ होतं असते.काही मुलं मुली तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्येच राहणे पसंत करतात.त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य हवे असते.त्यामुळेच पालकांची मानसिकता शिक्षणाविषयी बदलत असताना आपणांस दिसून येत आहे.काहीजणांना तर बेकारी मध्येच जीवन जगावे लागते.आजची तरूण पिढी ही जास्त व्यसनाधीन बनत चाललेली दिसून येत आहे.आज तरूण हे आईवडीलांना सळो की पळो करून सोडत आहेत.श्रावण बाळाने आपल्या आईवडीलांना खांद्यावर घेऊन (कावड घेऊन) तीर्थ यात्रा केली.पण आजचे युवक वृद्धाश्रमाची यात्रा करायला भाग पाडत आहेत.वडील तर मुलांसाठी
"घराच्या सुखासाठी,
खातो मिरची भाकर
पोरं लेकी बाळीसाठी
कधी बनतो चाकर"
"रक्ताचे पाणी केले
त्याने मुलांबाळांसाठी
वृद्धाश्रम दावी मुलगा
म्हाताऱ्या बापासाठी"..
शेवटी पालकांना व मुलांना एवढेच सांगावे वाटते की,शिक्षणाविषयीची जी मानसिकता आहे.ती मानसिकता सकारात्मक असावी.पण नोकरीच्या अपेक्षा ठेवून आपण शिक्षण मुलांना देत असतो.त्यात काहींना यश येते तर काहींना अपयश.मात्र आजचे युवक व युवती असे म्हणत असतात की,एवढे शिक्षण शिकून कुठे नोकऱ्या आहेत.नोकऱ्या नाहीत कशाला त्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात.शिक्षण हे फक्त नोकरी पुरते मर्यादित राहत नाही तर ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम हे शिक्षण, जगण्याचा मार्ग हे शिक्षण दाखवत असते.
प्रा.श्री.शेळके सुदर्शन किशनराव
श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ता. वसमत जि. हिंगोली
9822644781
Comments